*भद्रावती शहरात आरोपीच्या घरून गांजा जप्त*

89

*भद्रावती शहरात आरोपीच्या घरून गांजा जप्त*

*गांजाचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता; युवकांचे व विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचविण्याची मागणी*

भद्रावती :

स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत घरी विक्रीसाठी आणून ठेवलेला गांजा दिनांक १४ फेब्रुवारीला आरोपीच्या घरून जप्त करण्यात आला आहे. कलम ८(क), २०(ब) ii (अ) गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम (एन.डी.पि.एस. ॲक्ट) १९८५ अन्वये स्थानिक पोलीस स्टेशन मधे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

सविस्तर वृत्त असे की, गोपनीय माहितीनुसार स्थानिक समता नगर येथे राहणारा रवि सिडाम (वय 53) हा त्याचे रहाते घरी गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्याकरीता स्वतः जवळ बाळगुन असल्याचे पोलीस विभागाला माहित झाले. सदर बातमी मिळताच जिल्हा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथकासह आरोपी रवि सिडाम याचे घरी छापा जप्ती कार्यवाही केली, त्यात प्लास्टिक पिशवीत गांजा आढळून आला. त्यानुसार आरोपी रवि सिडाम यास अटक करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नुकतेच स्थानिक इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेतील वर्ग ८ ते १२ मधील विद्यार्थी गांजा घेत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. शहरात गांजा व ड्रग्स विक्रीचे रॅकेट सक्रिय असल्याचा पुरावाच या घटनेतून प्राप्त झाला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष घालून तरुण व विद्यार्थी दशेतील युवकांना यातून वाचाविण्याकरीता पोलीस प्रशासनाने कडक मोहीम उघडावी, अशी मागणी आहे.
———————————————–

*रवींद्र शिंदे यांनी साधला पालकमंत्र्यांशी संपर्क; लवकरच पोलीस विभागासोबत बैठक घेवून दक्षता समिती बनविण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन*

जिल्ह्यात सुरू असलेल्या गांजा व ड्रग्सची विक्री तथा नशेखोरीच्या समस्येवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी जिल्ह्यातील पालकमंत्री महोदय ना. सुधीर मुनगंटीवार यांचेशी संपर्क साधला. प्रकरणाचे गांभीर्य समजावून सांगितले. वरोरा, भद्रावती तथा संपूर्ण जिल्ह्यात वाढत असलेली गांजा व ड्रग्सची नशेखोरी त्यात प्रभावित होत असलेले विद्यार्थी व तरुण तथा भद्रावती शहरात या प्रकरणात झालेली एफआयआर याबाबतचे दाखले दिले. सोबतच दारुबंदीच्या काळात गांजा व ड्रग्जची पाळेमुळे जिल्यात रोवली गेली ती आज ही कायम आहे, असे सांगितले. विषयाचे गांभीर्य लक्षात घेत, ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सदर प्रकरणात लवकरच पोलीस अधीक्षक तथा स्थानिक ठाणेदार यांची बैठक लावू. तथा दक्षता समित्या बनवून जिल्ह्यातून ड्रग्स व गांजा यांचा नायनाट करण्यासाठी पाऊल उचलू असे आश्वासन दिले. सोबतच या ड्रग्ज व गांजाच्या विळख्यात असलेल्या तरुण विद्यार्थ्यांना सुधरविण्यासाठी कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचेही बोलणे झाले.