जनतेचा जीव व शेती महत्त्वाची की खाणी ?

178

वृत्त विश्लेषण

जनतेचा जीव व शेती महत्त्वाची की खाणी ?

#chandrapur #coalmines #baranj #maharashtra #agriculture

चंद्रपूर जिल्ह्यात जागोजागी कोळसा खाणींनी उभे केलेल्या मातीच्या ढीगाऱ्यामुळे गाव, शेती व मनुष्य संकटात

चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्ह्यात जागोजागी वेकीलिने उभे केलेले ढिगारे आणि खाणी दिसत आहेत. याच खाणीमुळे चंद्रपूर जिल्हा आतून पोकळ झाला आहे. यामुळे जिल्ह्यात गाव, शेती व मनुष्य यांवर मोठे संकट उभे राहत असताना आणखी नव्या खाणी सुरू करणे चालूच आहे, हा एक चिंतेचा विषय बनला आहे.

घुग्गुस येथे जमीन कोसळून मोठा बोगदा तयार झाला होता. वेकोली ढिगाऱ्यामुळे तापमानात फरक पडून शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठे नुकसान होत आहे. वेकोलीच्या काटेरी झुळपामुळे जंगली जनावरे आणि नागरिकांमध्ये संघर्ष सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पिकात हे जंगली जनावरे धुमाकूळ घालत आहे. पावसाळ्यात या ढिगाऱ्यामुळे नदीकाठच्या परिसरात महापुराची परिस्थिती निर्माण होत आहे.

या सर्व समस्या वेकोलिची देण आहे. मागील पावसाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीला आलेले महापुराचे कारण जरी यावर्षी पडलेला संततधार पाऊस असला तरी वेकोलीच्या ढिगाऱ्यामुळे या पुराचे पाणी गावागावात शिरले होते व खाणीलगत असलेली गावे पाण्याखाली होती. १९९४ मधे आलेल्या महापुरापेक्षा पेक्षा अधिक नुकसान या वर्षीच्या पुरात झाले.

वर्धा नदीच्या अगदी पात्राजवळ वेकोलिने मोठमोठे ढिगारे उभे केले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नदीपात्रातील पाणी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पसरतात. चंद्रपूर, भद्रावती व वरोरा तालुक्यातील एकोना, माजरी, चारगाव, ढोरवासा, तेलवासा, उकनी, पिंपळगाव, बेलसनी आणि घुग्गुस जवळ नदीपात्रालगतच मोठे मोठे ढिगारे उभे करण्यात आल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी या ढिगाऱ्याना अडून पिपरी (देश), कोची, घोनाड, बेलसनी,
चारगाव, कोंढा, माजरी आणि जिल्ह्यातील बऱ्याच गावात पुराचे पाणी शिरले. या परिसरातील वृद्ध व्यक्तींच्या मते, त्यांनी आजपर्यंत एव्हढा मोठा पूर व पुरामुळे झालेले इतके मोठं नुकसान बघितले नाही.

महापुराचे हे महाकाय कृत्रिम संकट वेकोलीने तयार करून यावरच आता वेकोली न थांबता वेकोलिद्वारे अगदी नदीपात्राजवळ पिंपळगाव, उकणी आणि जूनाळा येथे मातीचे ढिगारे उभे केले जात आहे. परिणामी उकनी गावामध्ये पुराचे पाणी शिरत असल्यामुळे उकनी आणि पिंपळगाव या गावाचे पुनर्वसन वेकोलिद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील नदीलगत असलेल्या गावाबद्दल अजूनही काहीच ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आता जर येत्या पावसाळ्यात महापूर आलाच तर भद्रावती तालुक्यातील पिपरी (देश) हे गाव पूर्णतः वाहून जाईल अशी शक्यता नाकारता येणार नाही. गेल्या पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे संपूर्ण गावातील शेती आणि काही घरे पाण्याखाली आली होती. यास सर्वस्वी जबाबदार वेकोली आहे. पिपरी (देश) गावातील प्रतिनिधी आणि नागरिकांनी ऊर्जाग्राम, कुचना आणि भालर येथील वेकोली मुख्यप्रबंधक यांची भेट घेऊन निवेदन सुद्धा दिले. मात्र आमच्या वेकोली ढीगाऱ्यांमुळे पूर आलाच नाही असं उत्तर वेकोली अधिकारी देतात. काही अधिकारी पाठवून तुमच्या गावातील कामे सांगा आम्ही सीएसआरमार्फत काम करून देऊ असे सांगून मोकळे होतात.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पुरपिढीत गावाची पाहणी करून अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश दिले होते, मात्र महिने लोटून सुद्धा काही कार्यवाही झाली नाही.

वर्तमान पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांना भेटून विविध मागण्यांचे निवेदन देऊन मात्र पुरपिढीतांच्या पदरात आश्वासन पलीकडे काहीच पडत नाही.

आणखी वेकोलीचे ढिगारे उभे करणे सुरू करण्यात आले असून वेकोली जनतेच्या जीवावर उठली काय? सरकार आणि लोकप्रतिनिधी याकडे जाणूनबुजून तर दुर्लक्ष करत नाही ना? असे प्रश्न गावकरी विचारत आहे.